पालघर (प्रतिनिधी): (निलेश गावंडे)
भीमा कोरेगाव येथील आपल्या पूर्वजांच्या शौर्याचा विजयस्तंभ सध्या अतिक्रमणीत असून या ऐतिहासिक प्रकरणाची प्रशासकीय व न्यायालयीन लढाई सध्या सुरू असून हा न्यायालयीन लढा सामाजभिमुख व्हावा आणि या लढ्यात प्रत्येक भीमसैनिकाने प्रत्यक्ष सहभागी व्हावे म्हणून जनजागृती अभियान राबविण्यात येत असून पालघर जिल्ह्यातील सर्व भीमसैनिकांनी आपले पक्षीय व इतर मतभेद बाजूला ठेवून या ऐतिहासिक लढ्यात सामील व्हावे असे आवाहन भीमा कोरेगाव विजयस्तंभ संरक्षण व संवर्धन समिती व कोरेगाव भीमा जयस्तंभ बचाव समितीचे अध्यक्ष दादाभाऊ अभंग यांनी पालघर येथे केले. भीमाई नगर, पालघर (पूर्व) येथे दिनांक २ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी ११ वाजता “कोरेगाव भीमा जयस्तंभ बचाव समिती, पालघर जिल्हा कमेटी” तर्फे आयोजित “कोरेगाव भीमा जयस्तंभ – इतिहास आणि वर्तमानाची वास्तविकता” हा जनजागृतीपर कार्यक्रम अत्यंत उत्साहात व प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाला. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान मा. किरण हरिभाऊ जाधव (जिल्हा अध्यक्ष, पालघर) यांनी भूषवले, तर कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून महाराष्ट्र राज्य कोरेगाव भीमा जयस्तंभ संरक्षण व संवर्धन समितीचे राज्य अध्यक्ष, समाजभूषण मा. दादाभाऊ अभंग हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. समाजभूषण दादाभाऊ अभंग यांनी कोरेगाव भीमा युद्धाचा इतिहास, त्यामागील सामाजिक व ऐतिहासिक पार्श्वभूमी, तसेच आजच्या काळातील त्याचे वास्तव आणि समाजासाठी असलेले महत्त्व यावर सखोल व प्रेरणादायी भाष्य केले. त्यांनी सांगितले की, “कोरेगाव भीमा जयस्तंभ हा आमच्या आत्मसन्मान, संघर्ष आणि न्यायाच्या प्रतीकाचे जिवंत प्रतीक आहे.”त्यांच्या प्रभावी मार्गदर्शनाने सभागृहात उपस्थित श्रोत्यांमध्ये नवचैतन्य आणि विचारप्रेरणा निर्माण झाली. कार्यक्रमाच्या शेवटी अनेक उपस्थितांनी प्रश्न विचारले, त्यांना दादाभाऊ अभंग यांनी समजूतदारपणे आणि तथ्यपूर्ण उत्तरे देत लोकजागृतीचा संदेश दिला. या प्रसंगी राज्य उपाध्यक्ष मा. रतन स. अस्वारे, जिल्हा सरचिटणीस मिलिंद लोखंडे, जिल्हा उपाध्यक्ष नागसेन, किरणजी थोरात, अनंत जाधव, भीमराव गाडे, प्रवचनकार मुख्य संपादक गंगाधर जामनिक. प्रवचनकार उपसंपादक निलेश गावंडे, संजय गायकवाड, संजय कुलै, किरण थोरात जिल्हा उपाध्यक्ष, रिपब्लिकन पार्टी जिल्हा अध्यक्ष मा. सुरेश जाधव, बी.एस.पी. जिल्हा अध्यक्ष मा. सुरेश जाधव, तसेच तालुका अध्यक्ष मंडळी – दीपक गायकवाड (पालघर), ज्ञानेश्वर पालवे (मोखाडा), सुहास ढाले (विक्रमगड), ऍड. चेतन भोईर (वसई), विश्वास वाघ (तलासरी), अनिल जाधव (डहाणू), सुजय जाधव (वाडा) आदी मान्यवर उपस्थित होते.माजी लोकपाल छबीलदास गायकवाड, संजय गायकवाड, राजेश गायकवाड, संजय जाधव, आनंद राऊत, प्रमोदजी भोणे
कार्यक्रमास पालघर जिल्ह्यातील विविध भागांमधून आलेले भीम अनुयायी, सामाजिक कार्यकर्ते, तरुण वर्ग आणि माता भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. कार्यक्रमादरम्यान समाजभूषण दादाभाऊ अभंग आणि जिल्हा अध्यक्ष मा. किरण हरिभाऊ जाधव यांनी शाल आणि पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांचा सन्मान करण्यात आला.
सुत्रसंचालनाचे सुंदर व संयमी कार्य जिल्हा सरचिटणीस मा. मिलिंद लोखंडे यांनी केले, तर भावपूर्ण शब्दात आभार प्रदर्शन मा. नागसेन गायकवाड यांनी मानले.
हा कार्यक्रम केवळ एक सभा नव्हती, तर इतिहासाचे जतन, आत्मसन्मानाची जागृती आणि पुढील पिढ्यांसाठी संघर्षाची दिशा दाखवणारा सामाजिक संदेश होता. “कोरेगाव भीमा जयस्तंभ बचाव समिती, पालघर जिल्हा” तर्फे अशा उपक्रमांद्वारे समाजजागृतीचा दीप अधिक तेजाने प्रज्वलित होत आहे.

