चांदयापासून बांदयापर्यंत तर जम्मू काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत अनेक राजकीय पक्षांना पडलेला प्रश्न म्हणजे आठवले साहेबांच्या पक्षाचे उमेदवार ईशान्य भारतात निवडून आलेच कसे?
कोणतीही निवडणूक लढायला पूर्वतयारी करावी लागते. प्रस्थापित पक्ष प्रत्येक निवडणुकीची पूर्वतयारी करूनच आपला उमेदवार देत असते. पण छोट्या प्रादेशिक पक्षांमध्ये निवडणूक पूर्वतयारीचा अभाव आढळतो आणि त्यांनी तो मान्य करायलाही हवा. निवडणुकीत फक्त मतदान मिळवून चालत नाही तर उमेदवार विजयी व्हावा लागतो, तेव्हा त्या मतदानाला महत्व प्राप्त होते, मग ते मतदान १०० असो की १ लाख याने काही फरक पडत नाही.
मा. विनोद निकाळजे यांच्यावर रिपाई (आठवले) पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी ईशान्य भारताच्या प्रभारी पदाची जबाबदारी सोपवली आणि ते कामाला लागले. मागील ७-८ वर्षे त्यांनी तिथे सामाजिक प्रश्न सोडवण्यावर विशेष भर दिला, तिथल्या समस्या जाणून घेतल्या आणि आठवले साहेबांच्या मार्फत अनेक प्रश्न मार्गी लावले. आणि त्याचे फलित म्हणजे नागालँड मध्ये दोन उमेदवार विधानसभा निवडणुकीत निवडून आले. यावरून आठवले साहेबांची दूरदृष्टी दिसून येते.
साहजिकच आहे की जर रिपाईला नागालँड या राज्यात उमेदवार निवडून आणता येतात तर महाराष्ट्रात का नाही. तर कारण असे आहे की महाराष्ट्रातील राजकारण हे जातीचे राजकारण आहे, येथे विकास कामांपेक्षा जातीला जास्त प्राधान्य दिले जाते, त्याचप्रमाणे इथल्या समस्या ह्या वेगळ्या आहेत. पण पक्ष यावर सुद्धा भर देत आहे आणि येणाऱ्या निवडणुकीत नक्कीच एक चांगली सुरुवात महाराष्ट्रात सुद्धा होऊ शकते.

कुणाचे आमदार का आले, कोण आमदार का झाले, यापेक्षा आपले का निवडून येत नाही, यावर जर भर दिला तर नक्कीच मनातील घृणा कमी होऊन नवीन कार्य करण्याची इच्छा जागृत होईल, पण त्यासाठी सत्य मान्य करावं लागतं आणि सत्य मान्य करायला कोणत्याही पक्षाच्या पदाधिकारी अथवा कार्यकर्त्यापेक्षा सामान्य माणसाचं काळीज असावं लागतं…
🖋️ प्रकाश वानखेडे, भांडुप, मुंबई