मुंबई दि.17 (प्रतिनिधी )
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे स्त्रियांसाठी, कामगार वर्गासाठी, शेतकऱ्यांसाठी फार मोठे योगदान आहे, ते केवळ दलितांचेच कैवारी नाहीत तर त्यांनी ओबीसीं वर्गासाठी आरक्षनाच्या माध्यमातून सोयी सवलती देण्याचे फार मोठे काम केले आहे. परंतु बाबासाहेब एका ठराविक वर्गाचे असल्याचा जो अपप्रचार केला जातो, तो अत्यंत चुकीचा असून तो पुसून टाकणे अत्यंत महत्वाचे आहे अशा शब्दात आंबेडकर चळवळीचे गाढे अभ्यासक, विचारवंत दादाभाऊ अभंग यांनी परखड मत मांडले.
प्रतीक्षा नगर, शीव येथील जेतवन बुद्ध विहार येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवन व कार्य या व्याख्यानात दादाभाऊ अभंग यांनी बाबासाहेबांबद्दल आपले मौलिक विचार मांडले. स्त्रियांसाठी शिक्षणापासून ते अगदी वडिलांच्या प्रॉपर्टी मध्ये हक्क मिळवून देण्यापर्यंत तसेच प्रस्तुतीच्या रजेपर्यंत महिलांना अनेक सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात बाबासाहेबांचे फार मोठे योगदान आहे. कामगार वर्गाला मिळणारे हक्क, भरपगारी रजा, निवृत्ती वेतन, हे कशाचे दोत्तक आहे. याचाही विचार होणे गरजेचे आहे. कोकणातली खोती प्रथा नष्ट करण्यामध्ये बाबासाहेबांचा फार मोठा वाटा होता, याबद्दल त्यांनी अतिशय मार्मिक शब्दात मार्गदर्शन केले. बाबासाहेब हे दलितांचे कैवारी आहे, असा जो समज पसरला जातो त्यांच्यावर आसूड घेताना त्यांनी अतिशय मार्मिक भाषेत बाबासाहेबांची चळवळ आणि बाबासाहेबांच्या चळवळीतील पुढाऱ्यांची उदासीनता यावर चिंता व्यक्त केली. याबद्दल सांगताना त्यांनी भीमा कोरेगावच्या लढ्याचा उल्लेख केला. सातत्याने भीमा कोरेगाव अतिक्रमण लढा देत असताना समाजाबरोबर नेत्याचीही साथ मिळत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. केवळ बाबासाहेबांच्या प्रती आणि त्यांचे समाजासाठी असलेले योगदानाचे महत्त्व लक्षात घेऊनच मी हा लढा पुढे नेत आहे. या लढ्यासाठी सतत पत्रव्यवहार करून अनेक ऐतिहासिक, महसूली दस्तऐवज जतन करून ठेवला आहे. त्यासाठी ते सातत्याने कोर्टातही गेले आहेत कोर्टातही त्यांचा लढा सुरू आहे. दरवर्षी भीमा कोरगावसाठी कोर्टाची परवानगी घ्यावी लागते, ही बाब निदर्शनास आणून देतानाच त्यांनी ही लढाई शेवटपर्यंत जिंकल्याशिवाय राहणार नाही असा निर्धार व्यक्त केला. या लढ्याला आपल्या पत्नीची मोलाची साथ लाभल्याचे आवर्जून सांगितले. या आंदोलनाला स्वतःच्या खर्चाने हातभार लावत असल्याचे सांगताना त्यांनी उपस्थितांना या लढ्याला पाठिंबा देण्याचे आवाहन केले.
यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशांत साळवी, आभार प्रदर्शन मिलिंद जाधव यांनी केले तर जेतवन बुद्धविहाराचे अध्यक्ष चंद्रकांत जाधव यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी उत्तम आढाव, भाऊ लोखंडे, अरविंद दंडाले, उत्तम जाधव, अनिल वाघमारे राजू कांबळे, विलास कांबळे, अनिल नितनवरे, वामन सरोदे,दिनेश सोनावणे, विश्वास कांबळे, चंद्रकांत कांबळे, महेंद्र सावंत, याच बरोबर महिला मंडळाची उपस्थिती मोठ्या प्रमाणावर होती.
